पिंपरी :- महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड,मातंग साहित्य परिषद व निवारा बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०१व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या अखिल भारतीय मराठी कविसंमेलनाच्या कार्यक्रमाप्रसंगी मा.दादा इदाते म्हणाले ” ज्यांच्या जयंती निमित्त हे कविसंमेलन घेतले आहे ते लोकशाहिर अण्णा भाऊ साठे हे स्वत: कवी होते, शाहिर होते, ज्यांच्या साहित्यातील लेखनाची दखल तात्कालिन काळात घेतली गेली नाही जे आजच्याही काळात वास्तवतेचा अनुभव देते.अण्णा भाऊंना भारतरत्न म्हणायला आवडेल.खरं तर भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक तर वंचितांच्या असंतोषाचे जनक हे लोकशाहिर अण्णा भाऊ साठे होते “। तर ” कविता एक विचार आहे ज्याची ताकद अनुभवावी लागते. कवीच्या मनात अनेक संवेदनशील विचार घोळत असतात जे गद्य अथवा पद्य अशा कवितेच्या रुपात बाहेर पडत असतात. परंतु जी र्हदयातून येते, ती कविता असते असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री आणि लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले यांनी कविसंमेलनाच्या अध्यक्ष पदावरुन मार्गदर्शन करताना केले.

या काव्य संमेलनात भारतातील विविघ राज्यातून मान्यवर कविंनी सहभाग घेतला.मुंबईच्या शिल्पा पुरुळेकरांनी
” आधार शोधताना आधार होत गेले
जो भेटला तसा मी आकार होत गेले
ही कविता सादर केली. तर
“लोकशाहीत काहीही घडते
वाळुला दगड म्हंटले जाते
विहिरीला समुद्र केले जाते ”
ही कविता आहे गोवा येथील कवी रमेश वंसकर यांची आहे.
अशा एकाहून एक आशयपुर्ण कविता भारतातील महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक येथील राज्यातून आलेल्या कविंनी सादर करुन उत्तरोतर कार्यक्रम रंगवत नेला आणि रसिकांना खिळवून ठेवले.

यावेळी व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रिय भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते, विवेक मासिकचे सह कार्यकारी संपादक रविंद्र गोळे , अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य प्रदीप दाते उपस्थीत होते तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्षा विनीता ऐनापुरे, मातंग साहित्य परिषद चे अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे, निवारा बहुउद्देशीय सामाजिक संस्थाचे अध्यक्ष महेन्द्रकुमार गायकवाड हजर होते.
रविंद्र गोळे आणि प्रदीप दाते, डॉ.धनंजय भिसे, महेन्द्र्कुमार गायकवाड यांनीही यावेळी मनोगते व्यक्त केली.

सदर कविसंमेलनात महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून शोभा तेलंग इंदौर (म.प्र.), डॉ. अविनाश सांगोलेकर (पुणे ), रमझान मुल्ला (सांगली), रमेश वंसकर (गोवा) अरुंधती वैद्य (नागपूर), प्रसाद देशपांडे बडोदा (गुजरात), जोत्स्ना चांदगुडे (पुणे), राजेंद्र अत्रे ( उस्मानाबाद), डॉ. अशोक शिंदे (फलटण), हनुमंत चांदगुडे, ( बारामती), नूतन शेटे (बंगलोर) संजय जगताप (पिं.चिं.), संगीता झिन्झुरके (पिं.चिं), शिल्पा परुळेकर (मुंबई) आदि प्रतिभावंत कवी सहभागी झाले होते. सदर कविसंमेलनास विविध राज्यातील कविंचा तसेच रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
राजन लाखे यांनी प्रास्ताविक केले तर नूतन शेटे यांनी सुत्रसंचालन केले.तर आभार संजय जगताप यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *