विलनीकरणाची अधिसूचना ७ जून २०२१ रोजी जारी करण्यात आली. विलीनीकरण करताना राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच शहरातील नागरिक व स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याची आवश्यकता होती. सरकारने तसे काहीच केले नाही. आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह शहरातील सर्व लोकप्रतिनिधींनी प्राधिकरणाचे पिंपरी-चिंचवड महापालिकेत विलीनीकरण करण्यात यावे, अशी मागणी वारंवार केली होती. ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले होते. प्राधिकरणाचे पीएमआरडीएत विलीनीकरण करण्याच्या प्रस्तावाला आमदार लक्ष्मण जगताप यांनी अधिवेशनातही विरोध केला होता. एकाच महानगरपालिका क्षेत्रात दोन प्रशासकीय यंत्रणा नको, अशी भूमिका आमदार लक्ष्मण जगताप यांनी सरकारकडे मांडली होती. परंतु, सरकारने काहीही विचार न करता प्राधिकरणाचे पीएमआरडीएत विलीनीकरण करण्याचा अंतिम निर्णय घेतला.
हा निर्णय घेताना संपूर्ण प्राधिकरणाचे पीएमआरडीएत विलीनीकरण न करता प्राधिकरणाचा विकसित भाग पिंपरी-चिंचवड महापालिकेत आणि मोकळे भूखंड व चालू प्रकल्प पीएमआरडीएत विलनीकरण करण्याचा विचित्र कारभार महाविकास आघाडी सरकारने केला आहे. सरकारचा हा निर्णय पिंपरी-चिंचवडच्या विकासाला खीळ घालणारा निर्णय आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात आपण न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल करणार असल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले होते. त्यानुसार त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (क्रमांक – PIL/13788/2021) दाखल केली आहे. आमदार जगताप यांनी अॅड ललित झुनझुनवाला आणि अॅड. मोहित बुलानी यांच्यामार्फत केलेली ही याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली आहे. आता या याचिकेवर काय सुनावणी होते आणि अंतिम निर्णय काय होतो?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.