– राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरक्षकांना दिला आश्वासन
– डॉ. मिलिंद एकबोटे यांचे उपोषण स्थगित, आमदार महेश लांडगे यांची शिष्टाई

पिंपरी । प्रतिनिधी :- राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेऊन गोशाळांना अनुदान देण्यात येईल. तसेच, शेतकऱ्यांना गोवंश संवर्धनासाठी निधी देण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

श्रीक्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी घाटावर प्रखर हिंदूत्ववादी नेते तथा गोरक्षक डॉ. मिलिंद एकबोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशी गोवंश संरक्षणासाठी देशी गोवंश बचाव जनआंदोलन व उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला भाजपा आमदार महेश लांडगे यांनी भेट दिली. यावेळी आमदार लांडगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत मोबाइलद्वारे संपर्क साधला. यावेळी तो प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन उपुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.

राज्य सरकार, केंद्र सरकारकडे गोवंश संरक्षणासाठी एकत्रितपणे पाठपुरावा करू, अशी विनंती आमदार महेश लांडगे यांनी डॉ. मिलिंद एकबोटे यांना केली. उपमख्यमंत्री यांनी दिलेल्या शब्दामुळे व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मिलिंद एकबोटे यांनी तिसऱ्या दिवशी उपोषण स्थगित केले आहे.

डॉ. मिलिंद एकबोटे  म्हणाले की, देशी गोवंश संरक्षणासाठी निर्णय होईल असा ‘शब्द’ मला देण्यात आला आहे. महेशदादांच्या शब्दावर विश्वास ठेवतो. आठ दिवसांत तशी हालचाल व निर्णयात्मक प्रक्रिया सुरू झाली नाही, तर पुन्हा येथे उपोषणास बसणार आहे. देशी गोवंश पाळणारे जे लोक आहेत, शेतकरी आहेत व शेतकऱ्यांबरोबर जे अन्य लोक आहेत त्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत कारण आपल्या गोवंशाची काळजी आपणच घेऊ शकतो आणि त्याबाबतीत सरकारकडून सहकार्य व सवलती मिळणे अपेक्षित आहे.

***
प्रतिक्रिया :
राज्यात खिल्लार गाई व खिल्लार बैल आहेत. हे सोन आपल्याकडे आहे. त्या सोन्याची जपणूक करणे संभाळ करणे सोन वाढवण्याचा प्रयत्न करणे. यासाठी आपण एकत्र आलो आहोत. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मला सांगितले की, ‘‘महेश लांडगे यांच्या समक्ष ज्या गोशाळा आहेत.  त्या सर्व गोशाळांना सरसकट व  गोवंशाला अनुदान देण्याचा संबंधित निर्णय घेऊ.’’ त्यामुळे आम्ही उपोषण स्थगित करीत आहोत. मात्र, प्रश्न मार्गी न लागल्यास पुन्हा आंदोलन करणार आहे.
– डॉ. मिलिंद एकबोटे, गोरक्षक.
***

प्रतिक्रिया :
राज्यातील शेतकऱ्यांकडे देशी गोवंश आहे त्यांना अनुदान देण्याचा विचार झाला पाहिजे. नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी चिंतेत असतात. गाई व बैल सांभाळ करण्यासाठी त्यांना कसरत करावी लागते. त्यांना सहकार्य मिळणे सर्वात महत्वाचे आहे. निवडणूक आचारसंहितेपूर्वी तुमचा निर्णय करतो. त्याबाबत तांत्रिक बाबींचा विचार करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *