आजची संस्कृती आणि विवाह संस्था या विषयावर चिंतन करायला लावणारा चित्रपट

पिंपरी, पुणे (दि. ६ फेब्रुवारी २०२४) कोणतही नातं तोडणं सोपं असतं पण जोडणं अवघड असतं. हा नात्यांमधला गुंता वाढविण्याऐवजी तो जर सोडविता आला तर? या प्रश्नाचा शोध घेणारा “ॲड. यशवंत जमादार” हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निर्मिती एस. के. प्रॉडक्शन, निर्माते संजीवकुमार अग्रवाल तर अनिकेत अग्रवाल आणि चंद्रकांत ठक्कर हे सहनिर्माते आहेत. दिग्दर्शन रमेश साहेबराव चौधरी यांनी केले आहे. कथा आणि पटकथा संजय नवगिरे यांची आहे. सिनेमाचे डीओपी आणि संकलक सिद्धेश मोरे आहेत. मंदार चोळकर यांनी यातील गीते लिहिली असून अजित परब यांचे सुमधुर संगीत आहे. अमर लष्कर हे प्रोजेक्ट हेड आहेत. २२ जानेवारी रोजी सिनेमाचा मुहूर्त झाला असून सध्या पिंपरी, चिंचवड, हिंजवडी प्राधिकरण परिसरात सिनेमाचं चित्रीकरण सुरू आहे अशी माहिती निर्माता संजीवकुमार अग्रवाल यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

अभिनेता मकरंद देशपांडे, ऋषिकेश जोशी, भारत गणेशपुरे, कैलास वाघमारे, अभिनेत्री सायली संजीव, विशाखा सुभेदार, प्रतीक्षा जाधव, शिवाली परब, अनुष्का पिंपुटकर, प्राजक्ता हनमघर आदी मातब्बर कलाकारांकडून तितकाच उत्कृष्ठ अभिनय दिग्दर्शक रमेश चौधरी यांनी करून घेतला आहे.

करिअरच्या मागे धावणारी ही नवीन पिढी उशिरा लग्नाच्या बेडीत अडकते. पुढे काही दिवसात एकमेकांशी न पटल्यामुळे लगेच विभक्त होण्याचा पर्याय निवडतात. त्यामुळे आजची संस्कृती आणि विवाह संस्था या विषयावर चिंतन करायला लावणारा “ॲड. यशवंत जमादार” हा चित्रपट सर्वांना अंतर्मुख व्हायला लावतो असे अभिनेता मकरंद देशपांडे यांनी सांगितले.
—————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *