पिंपरी :- कविता ही नेहमीच प्रेरणादायी असते. कविता ही केवळ पद्य लालित्यात नाही तर गद्यातही असते. कवितांतून कायम मिळणारी प्रेरणा आजच्या काळात आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार केला असता ‘उम्मीद पर दुनिया कायम रहना जरुरी है’ वाक्य महत्त्वाचे असल्याचे वक्तव्य पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी चिंचवड येथे केले. थिएटर वर्कशॉप कंपनी आणि अविरत श्रमदान यांच्या वतीने आयोजित ‘गीतांजली’ कार्यक्रमात पत्रकार आणि पोलीसांशी संवाद साधताना ते बोलत होते.
थिएटर वर्कशॉप कंपनी आणि अविरत श्रमदान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील पैस रंगमच याठिकाणी पोलिस आणि पत्रकार यांचा गीतांजली काव्यमंचीय सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रसाद पोतदार, धनाजी कांबळे, सीताराम नरके, शिवचरण आढे आदी पोलिस कर्मचारी उपस्थित होते. तर अमोल काकडे, भूषण नांदूरकर, गोविंद वाकडे,नाना कांबळे, पितांबर लोहार आदी पत्रकार उपस्थित होते.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले की, मी आजवर माझ्या कवितांचे पुस्तक यायला हवे होते. मी साधारण एक हजार कविता रचल्या आहेत. येत्या काळात माझे पुस्तक प्रकाशित व्हावे असा मानस आहे. यावेळी कृष्ण प्रकाश यांनी खास आग्रहास्तव ‘मै खाकी हू’ ही कविता पेश केली. तसेच त्यांनी महिला आणि पुरुष समानतेवर परखड भाष्य करणारी ‘खबरदार आदमी’ ही कविता सादर करत वाहवा मिळवली.
कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी ‘नाना रंगातूनी रंगुनीया रंग वेगळा माझा खाकी, दुर्जनांचा कर्दळकाळ पण सज्जनांचा आब राखी’ ही कविता सादर करुन रसिकांची दाद मिळविली. या कवितेतून कर्तव्यदक्ष पोलिसांची भूमिका स्पष्ट केली.
पोलिस कॉन्स्टेबल शिवचरण आढे यांनी ‘खाकीतील वीर माझा आहे आज थकला, देह त्याने त्यागला’ या करोनाकाळात पोलिसांना कर्तव्य निभावत असतानाचे चित्र उभी करणारी कविता सादर केली. तर पुणे सायबर पोलिस स्टेशनमधील पोलिस कॉन्स्टेबल प्रसाद पोतदार यांनी ‘सायबर गुन्हा म्हणजे भावनांची शिकार. प्रेम, प्रलोभने तर कधी सुडाचा येथे घडतो प्रकार’ ही सायबर गुन्ह्यांवर आधारित कविता सादर केली.
यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील काही पत्रकार कवींनी देखील कविता सादर केल्या. करोनाकाळात सर्व ठिकाणी टाळेबंदी असताना पोलीस आणि पत्रकार आपले कर्तव्य बजावत होते. करोनामुळे बर्याच पोलिस आणि पत्रकार यांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेली दिड वर्ष करोना महामारीचा सामना करत असताना आलेले अनुभव कवितारुपाने प्रकट करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, थिएटर वर्क शॉप कंपनीचे संस्थापक प्रभाकर पवार यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन ऋतुजा दिवेकर,साक्षी धादमे, पवन परब, बाळकृष्ण पवार, कोमल काळे, सचिन बहिरगोंडे, अक्षय यादव, डॉ. निलेश लोंढे , दिगंबर जोशी यांनी नियोजन केले. प्राजक्ता गव्हाणे यांनी सूत्रसंचालन केले.