पुणे : मातंग साहित्य परिषद पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमध्ये “लोकमान्य टिळक, आगरकर, महर्षी शिंदे आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची परिषद ” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विविध सामाजिक,साहित्यिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना यावेळी “प्रभावशाली व्यक्तिमत्व पुरस्कार”देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकवादी विचारवंत डॉ.श्रीपाल सबनीस होते. प्रमुख पाहुणे पद्मश्री गिरीश प्रभुणे,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.पराग काळकर, मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.धनंजय भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ.श्रीपाल सबनीस म्हणाले, “जातीभेदांच्या पलीकडे जाऊन माणसांनी कायम काम करीत राहावे.लोकमान्य टिळक, आगरकर, महर्षी कर्वे, आण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या काळात जसे काम केले, तसे आजच्या काळात साहित्यिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रबोधनाचे काम केले पाहिजे !”

डॉ.धनंजय भिसे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा परिचय करून दिला. आण्णा धगाटे,संदीपान झोंबाडे,डॉ.संजय तांबट,या वक्त्यांनी गोपाळ गणेश आगरकर,महर्षि विठ्ठल रामजी शिंदे आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या कार्यकर्तॄत्वाचा समग्र आढावा आपल्या भाषणांमधून घेतला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. पराग काळकर आपल्या मनोगतात म्हणाले,”विद्यापीठ फक्त पदवी देण्याचे काम न करता ते समाजाला जोडण्याचे काम करीत आहे. सशक्त आणि न्यायपूर्ण समाज घडविण्यासाठी लोकमान्य टिळक,आगरकर, महर्षि विठ्ठल रामजी शिंदे, आण्णाभाऊ साठे आदी द्रष्ट्या पुरूषांचे आचारविचार सर्वांनी अमलात आणले पाहिजेत.”
चार महापुरुषांच्या विचारांचा परामर्श घेणाऱ्या या परिषदेत बोलताना पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले,”संतांनी समाजाला धार्मिक आणि सामाजिक अधिष्ठान दिले. त्यातूनच पुढे क्रांतीचा उगम झाला.पारतंत्र्याच्या काळात अखिल भारतीय पातळीवर देशाचं नेतृत्व करणाऱ्या लोकमान्य टिळकांनी स्वराज्य ही कल्पना ठणकावून सांगितली.आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण संविधान अभ्यासले पाहिजे.”

या वैचारिक मंथनानंतर शब्दधन आणि दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक , समरसता साहित्य परिषदेच्या अध्यक्षा मानसी चिटणीस, सामाजिक कार्यकर्ते उत्तम दंडिमे यांना मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे प्रभावशाली व्यक्तिमत्व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

तसेच या प्रसंगी येत्या १ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या “अवकारीका” या स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या चित्रपटाचे निर्माते भारत टिळेकर, दिग्दर्शक अरविंद भोसले आणि कलाकार रोहित पवार यांचाही सन्मान करण्यात आला.
रविंद्र शिंगणापूरकर यांनी सर्वांचे आभार मानले.सुनील भणगे यांच्या परिवर्तन गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
याप्रसंगी अशोक महाराज गोरे, नारायण कुंभार, तानाजी एकोंडे,नामदेव हुले, जयश्री गुमास्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *